Tuesday, 26 August 2014

सौर ऊर्जेशिवाय तरणोपाय नाही


ऊर्जा निर्मिती हा आपल्या देशापुढचा फार मोठा गहन प्रश्न झाला आहे. त्याला कारणही तसेच आहे. देशात अलिकडच्या काळात औद्योगिकरणाला मोठी गती आल्यामुळे विजेची मागणी वाढत चालली आहे. त्यामुळे विजेच्या सर्व पर्यायांचा वापर करून शक्य तेवढी वीज निर्मिती करण्यावर सरकारचा भर दिसून येत आहे. सद्या आपल्या देशामध्ये १ लाख ६५ हजार मेगावॅट एवढी वीजनिर्मिती होते. परंतु ही वीज पुरेशी नाही. याचा परिणाम आपल्याला, उद्योजकांना, शेतकर्‍यांना सातत्याने  भारनियमनाला तोंड द्यावे लागत आहे. भारनियमन कमी करायचे असेल तर वीज निर्मिती वाढवण्याशिवाय पर्याय नाही. दरवर्षी ३.६ टक्के एवढी विजेची मागणी वाढत चालली आहे. या सगळ्याचा विचार केला तर भविष्यात म्हणजे २०३० सालापर्यंत देशात ९ लाख ५० हजार मेगावॅट एवढी विजेची मागणी राहणार आहे. म्हणजे आगामी १९ वर्षात आपल्याला देशात वीज निर्मितीत सहापट वाढ करावी लागणार आहे. 
 भारतात प्रामुख्याने कोळसा जाळून वीज तयार केली जाते. असा क्रम असाच सुरू राहिला तर एक ना एक दिवस या पृथ्वीच्या पोटातील कोळशाच्या साठ्यांना मुकावे लागणार आहे. म्हणजे औष्णिक वीज निर्मितीला मर्यादा आहेत. तीच अवस्था जलविद्युत निर्मितीची आहे , असे म्हणावे लागेल. देशात जलविद्युत निर्मितीसाठी आवश्यक अशा जागा  उपलब्ध नाहीत. त्यामुळे या प्रकल्पलाही  मर्यादा आल्याच.बाकीच्या गैरपरंपरागत वीज निर्मितीच्या साधनांमध्ये सौर ऊर्जा हाच एक मार्ग असा आहे की, ज्याच्या साधनाला कसल्याही मर्यादा नाहीत. देशात अन्य देशांच्या तुलनेत ऊन भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. म्हणजे ऊन्हाला आपल्या देशात तोटा नाही , असे म्हणण्यासारखी परिस्थिती आहे. 
सूर्य लाखो वर्षांपासून आग ओकतो आहे. यापुढेही लाखो वर्षे आग ओकत राहील. त्यामुळे या ऊर्जा साधनाचा पुरेपूर वापर करण्याचे ठरविले तर पुढे शेकडो वर्षे देशाला वीज कमी पडायची नाही. वीज टंचाई जाणवणार नाही. सौर ऊर्जा जोखीमविरहीत आहे. अणु ऊर्जा जोखमीची आहे. औष्णिक ऊर्जा प्रदुषणकारी आहे. असा कोणताही तोटा, नुकसान करण्याचा प्रकार या सौर ऊर्जेने होणार नाही. अलिकडच्या काळात सरकारने याचे महत्त्व लक्षात घेऊन या क्षेत्रात वेगाने पावले टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ही बाब चांगलीच म्हटली पाहिजे. उशिराने सुचलेले शहानपण वाया जात नाही.
भारताला जगातील अन्य देशाच्या तुलनेत सूर्य प्रकाश प्रचंड प्रमाणात मिळत आहे. तरीही आपण त्याचा वापर करण्याचा अट्टाहास धरला नाही. त्यादृष्टीने संशोधन पुढे सरकले नाही. अर्थात राज्यकर्त्यांनी काळाची पावले ओळखण्यात चूक केली. अन्य प्रगत देशांनी मात्र पुरेसा सूर्य प्रकाश उपलब्ध नसतानाही या क्षेत्रात कमालीची प्रगती केली आहे. आपल्याजवळ मुबलक असूनही त्याचा वापर करता आला नाही. जिथं पिकतं , तिथं त्याची किंमत कळत नाही, हेच खरं ! अन्य देशात सौरशक्तिकेंद्र उभारून मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जा विद्युत ऊर्जेत रूपांतरीत करण्याचे प्रयोग यशस्वी झाले आहेत.
सध्या प्रत्येक राष्ट्राची विजेची गरज ही फारच वाढली आहे. आणि इतर ऊर्जा पदार्थांची मुबलकता कमी झाली आहे. त्यामुळे सौर ऊर्जेच्या पर्यायावर सर्व राष्ट्रांचा भर आहे. सौरऊर्जेच्या उपयोगाची आधुनिक उपकरणे पुढीलप्रमाणे आहेत. पेटीचा कुकर, सौरभट्टी, पाणी गरम करण्याचा प्लॅट, प्लेट कलेक्टर, गरम हवेचा कलेक्टर, शेतीचे पदार्थ वाळविण्यासाठी ड्नयर, खाऱ्यापाण्यापासून गोडेपाणी करणारा सोलर स्टील, उबदार राहणारे सौर घट, हिट पंप अशा अनेक प्रकारची सौर ऊर्जा उपकरणे विकसित झाली आहेत.

परदेशामध्ये पॉवर प्लॅट, सूर्य विजेवर चालणारे फ्रिज, सूर्यवीज केंद्रे इत्यादी वापरात आले आहेत. भारतामध्ये सुध्दा आधुनिक तंत्राच्या सहाय्याने सूर्यशक्तिचे प्रकल्प अनेक ठिकाणी सुरू आहेत. भोर-नाशिक भागातील रस्त्यावरील दिवे सूर्य विजेवर चालतात. धुळे जिल्ह्यात ३२० एम. डब्ल्यू. सूर्य वीज प्रकल्प १९८५ मध्ये सुरू झाला आहे. सद्या याच जिल्ह्यात १५० मेगावॅत क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारला जात आहे. चंद्रपूरलाही मोठा प्रकल्प होत आहे. तामीळनाडूत सूर्यविजेवर रेल्वे सिग्नल, तिरूपती-बंगळूर-विशाखापट्टणम येथे इंटरलॉक पध्दती, ग्रामीण पंपासाठी, सूर्य विजेचा वापर दिल्लीजवळ मसुदपूर खेड्यात प्रत्येक घरात स्वयंपाक, दिवे, पाण्याचे पंप, टी. व्ही. रेडिओ हे सर्व सूर्यविजेवर चालतात. अपंगाच्या सायकलीसाठी सूर्य ऊर्जा वापरली जाते.
सध्याच्या विज्ञानयुगात प्रगत तंत्रज्ञानासाठी लागणारीवीज अंतराळात मोठ्या प्रमाणात निर्मिती करून तिचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे अंटार्क्टिका मोहिमेसाठी उपग्रहाच्या रिमोट कंट्रोलसाठी, रडार यंत्रणा इत्यादी ठिकाणी सूर्य विजेचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

सौर ऊर्जा महाग वाटत असली तरी अंतिमतः स्वस्त पडते. १९९० च्या दशकामध्ये अनु, जल, आणि औष्णिक या विद्युत निर्मितीच्या प्रकारांचा उत्पादन खर्च सौर ऊर्जेपेक्षा फारच कमी होता. सौर ऊर्जा त्यामानने खूपच महाग होती. त्यामुळे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प फारसे वाढले नाहीत. पण आता परिस्थिती उलटी आहे. अंतिम दृष्ट्या पाहिले तर सौर ऊर्जा स्वस्त पडते. कारण या प्रकल्पाचा राखरखवाचा खर्च फार कमी आहे.  कुठले प्रदूषण होत नाही. त्यामुळे प्रदूषण नियंत्रणावर होणारा अन्य खर्च  टळतात. प्रदूषण होणे हासुद्धा अपव्यय आहे. असा विचार केला तर सौर ऊर्जा प्रकल्प स्वस्तच पडतात. त्यामुळे दूरगामी विचार करून या क्षेत्रात मोठी गुंतवणूक आवश्यक आहे.

देणे निसर्गाचे : सौरऊर्जेचे उपयोग



वाचकहो, याआधीच्या लेखामध्ये आपण सौरऊर्जेचा वापर वीज निर्मितीसाठी कसा केला जातो हे पाहिले. या लेखामध्ये आपण सौरऊर्जेचे अजून काही उपयोग पाहणार आहोत.
आपल्या देशामध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या सौरऊर्जेचा उपयोग हा पाणी गरम करण्यासाठी, अन्न शिजविण्यासाठी, पाण्याची वाफ करून ती औद्योगिक कारणांसाठी वापरणे वगरेसाठी होऊ शकतो. आज आपण प्रामुख्याने स्नानाकरिता लागणारे गरम पाणी तापविण्याच्या सौर प्रणालीबद्दल तसेच सोलर कुकरबद्दल माहिती घेऊयात.
आपण सर्वानी इमारतींच्या गच्चीवर बसविलेले सौरबंब पाहिले असतीलच. सूर्याकडून वर्षांकाठी जवळजवळ १० ते ११ महिने मुबलक मिळणाऱ्या या पूर्णत: मोफत अशा ऊर्जेचा वापर करून आपण किमान अंघोळीसाठी लागणारे पाणी गरम करून, विजेचा वापर कमी करू शकतो! खरे तर घरगुती वापराच्या विद्युत उपकरणांमध्ये गरम पाण्यासाठी वापरले जाणारे बॉयलर्स अथवा गिझर्स हे विजेचा मोठय़ा प्रमाणावर वापर करतात. त्यामुळे एकदाच सौर बंब बसविल्याने आपण कित्येक वष्रे मोफत गरम पाण्याचा आनंद लुटू शकतो!
सौरबंब हे १०० लिटर क्षमतेपासून पुढे दहा हजार/ वीस हजार/ तीस हजार लि. असे कितीही क्षमतेचे बसविता येतात. साधारणपणे 'एका व्यक्तीस एक बादली एका वेळेस' या हिशेबाप्रमाणे चार जणांच्या एका कुटुंबाला सामान्यत: १२५ लि. क्षमतेची प्रणाली पुरू शकते. अर्थात, थंडीच्या दिवसांचा, येणाऱ्या पाहुण्यांचा विचार केल्यास १५० ते २०० लि. ची प्रणाली जास्त आरामात वापरता येते. सौर प्रणाली बसविताना तिच्या क्षमतेचा व वापर करण्याच्या सवयींचा काळजीपूर्वक विचार करावा लागतो. उदा. कुटुंबामध्ये जरी चार सदस्य असले तरी काही जणांना सकाळ-संध्याकाळ असे दोन वेळेस स्नान करण्याची सवय असते. त्यामुळे संध्याकाळी प्रणालीतून गरम पाणी काढून घेतल्यावर टाकीमध्ये आलेले गार पाणी तापवायला रात्री सूर्य नसतो. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळीला गार अथवा कोमट पाणी मिळते. हे टाळण्यासाठी मुळातच थोडी जास्त क्षमतेची प्रणाली बसविणे गरजेचे आहे. तसेच (विशेषत: मोठय़ा सोसायटीमध्ये) सकाळी साधारणत: दहानंतर प्रणाली वापरणे थांबविल्यास दिवसभराच्या उन्हामुळे पाणी चांगले तापते.
सौरबंब हे शक्यतो कोणत्याही विद्युत साधनाव्यतिरिक्त म्हणजे- N.T.S. (Natural Thermo Siphon) या तत्त्वावर चालविल्यास त्यांना अक्षरश: १०/१५ वष्रे विशेष असा देखभालीचा खर्च येत नाही. पण अशा प्रणाली दीड ते दोन हजार लि. क्षमतेपर्यंतच चांगली कार्यक्षमता देतात. त्यापुढील क्षमतेसाठी मात्र मोटार पंप, कंट्रोल पॅनल, सेन्सर्स, इ.चा वापर करावा लागतो व ही विद्युत उपकरणे असल्याने त्यांच्या देखभालीचा खर्च अधूनमधून येऊ शकतो. मात्र अशा प्रणालींना वीज खूप कमी प्रमाणात लागते.
सौरबंबाचा वापर अंघोळीचे पाणी गरम करण्यासाठी होत असल्याने सर्वच ठिकाणी जसे- घरे, बंगले, सोसायटी, लॉजेस, हॉटेल्स, होस्टेल्स, हॉस्पिटल्स, देवस्थाने, गेस्ट हाऊसेस, फार्म हाऊसेस इ. ठिकाणी उपयोग होऊ शकतो. ही प्रणाली म्हणजे सौर पटले (सोलर पॅनल्स) व पाण्याच्या टाक्या या इमारतीच्या गच्चीवर बसविण्यात येतात. त्यातूनही सर्वात जास्त महत्त्वाचे म्हणजे सोलर पॅनल्सही गच्चीवरती 'सावलीविरहित जागेमध्येच' (shadow free area) बसविली गेली पाहिजेत. अर्थात, शहरी भागात उंच, बहुमजली इमारतीमुळे सदनिकांच्या प्रमाणात आवश्यक तेवढी 'सावलीविरहित जागा' उपलब्ध नसते. अशा वेळी गच्चीवर लोखंडी सांगाडा (structure) करून त्यावर पॅनल्स बसविणे हाच एक पर्याय राहतो. त्याचबरोबर नवीन इमारत बांधताना व विशेषत: गच्चीचे रेखाटन करताना ते गच्चीवरती कमीत कमी सावली येऊन जास्तीत जास्त वेळ ऊन राहील असे केले गेले तर त्याचा उपयोग सौर ऊर्जेचा कोणताही वापर करताना होऊ शकतो. 
सौरबंब प्रणालीमध्ये साधारणपणे दोन प्रकार आहेत: एफ.पी.सी. Flatt Plate Collector) व ई. टी. सी. (Evacuated Tubular Collector). पकी  एफ.पी.सी. हा प्रकार वर्षांनुवष्रे वापरला जाणारा व संपूर्णत: भारतीय बनावटीचा सौर बंब आहे. तर  ई. टी. सी. हा गेल्या काही वर्षांत लोकप्रिय झालेला पण चिनी बनावटीचा सौरबंब आहे. एफ.पी.सी. हा अधिक मजबूत व जास्त टिकाऊ आहे, पण त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या तांबे व इतर धातूंमुळे त्याची किंमत थोडी जास्त असते. तसेच धातूच्या पाइपमुळे  पाण्यातील क्षारांचा परिणाम होऊन प्रणाली कालांतराने बंद पडण्याचा धोका असतो. अर्थात, ठराविक काळाने हे पॅनल्स साफ केल्यास फारशी अडचण येत नाही.
ई. टी. सी. प्रणाली ही वजनाने हलकी व किमतीला तुलनेने बरीचशी कमी असते, पण त्याचबरोबर थोडी नाजूकही असते. तसेच ती काचेच्या नळ्यांची बनविलेली असल्याने जेथे पाणी क्षारयुक्त आहे तेथे जास्त उपयोगाची ठरते. अर्थात, प्रत्येक प्रणालीचे आपापले गुण व दोष असल्याने आपली गरज, भौगोलिक परिस्थिती, पाण्याची गुणवत्ता व सर्वात महत्त्वाचे आपले बजेट, या सर्व गोष्टींचा विचार करून निर्णय घेणे योग्य!  
सौरबंबामधून गरम झालेले पाणी हे अंघोळीव्यतिरिक्त हॉटेल्स/ कंपनी कॅण्टीनमध्ये भांडी धुण्यासाठी तसेच औद्योगिक वापरासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते. अनेक कारखान्यांमध्ये 'बॉयलेर फीड वॉटर' म्हणून सौरबंबामधून भौगोलिक परिस्थितीप्रमाणे ७५ ते ८० डी. सें. पेक्षा जास्त तापमानाचे पाणी मिळू शकते व पाण्याची वाफ करण्यासाठी होणारा इंधनावरचा खर्च कमी करता येतो.
सौरऊर्जेच्या या अत्यंत महत्त्वाच्या उपयोगाव्यतिरिक्त अन्न शिजविणे, औद्योगिक वापरासाठी पाण्याची वाफ करणे (३०० डी. सें.पेक्षा जास्त!), सोलर ड्रायर इ. अनेक कारणांकरिता सौरऊर्जेचा वापर होतो. लहानशा कुटुंबाला सोयीस्कर असा तीन किंवा चार भांडय़ाचा 'सोलर बॉक्स कुकर'पासून ते शेकडो/ हजारो माणसांचा स्वयंपाक करू शकणारे 'सोलर पाराबोलिक कुकर'देखील उपलब्ध आहेत
Amol Wakudkar
Mob.9850722808
M/S Shivnivrutti Universal Solar
www.snusolar.co.in
email:- shivnivrutti@gmail.com

      "सौर ऊर्जा निर्मिती" ठरणार काळाची गरज...

                                                            
महाराष्ट्र, मध्य प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये वीजेचे संकट उभे आहे. वीज कंपनीचा वाढत असलेला तोटा आणि सातत्याने वाढणारा वीजेचा दर ग्राहकांवर लादला जात आहे. यावर पर्याय म्हणून लवकरच "सौर ऊर्जा" ही काळाची गरज ठरणार आहे.

रेडिओ, फ्रीज, कूलर, फोन, मोबाईल या चैनीच्या वाटणार्‍या पूर्वीच्या वस्तू आज काळाची गरज ठरल्या आहेत. सध्या महाग आणि चैनीची वाटत असली तरीही "सौर ऊर्जा" अर्थात सोलर एनर्जीची गरज निर्माण होऊ लागली आहे...
कोकणातील रत्नागिरी नजीक ९,९०० मेगावॉट क्षमतेचा आणि जगातील सर्वात मोठा मानला जाणारा नियोजित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प आहे. हा प्रकल्प भूकंप प्रवण क्षेत्रामध्ये असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

मार्च ११ ला जपानमध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता ८.९ रिश्टर स्केल असून यानंतर आलेली त्सुनामी लाट यामुळे झालेल्या नुकसानीतून आता तीन महिने उलटूनही देश पूर्णपणे सावरलेला नाही. आणखी भूकंप होऊन आणखी जीवित आणि वित्तहानी होण्याची भीती लोकांच्या मनातून गेलेली नाही. वास्तविक जपान हा देश तंत्रज्ञानात अग्रेसर असून स्थिरचित्ताने शांततेने निर्णय घेण्यासाठी या देशाचा नावलौकिक आहे. सुमारे ४८ फूट उंचीच्या एका लाटेने फुकुशिमा येथील तीनपैकी एका अणुभट्टीला तडाखा दिल्याने या भट्टीतून किरणोत्सर्ग होऊन या किरणोत्सर्गाचे अत्युच्च पातळी गाठलेले पाणी प्रशांत महासागरात देखील गेले असल्याची भीती व्यक्त करण्यात आली. कारण काहीही असले तरीही नुकसान झाले आहे हे नक्की! 

नियोजित जैतापूर अणुप्रकल्प सुद्धा सध्या वादाच्या भोवर्‍यात आहे. या प्रकल्पामुळे फायदे होण्यापेक्षा तोटेच जास्त होणार असल्याचे स्थानिक जनतेचे मत आहे. मात्र, या प्रकल्पामुळे बेरोजगारी कमी होऊन वीज निर्मिती वाढणार असल्याचा पुनरोच्चार शासनाने केला आहे. जपानच्या फुकुशिमा अणुभट्टीचे उदाहरण भारतानेही डोळ्यासमोर ठेवण्याची गरज असल्याचा उल्लेख येथे करावासा वाटतो. भविष्यातील भूकंपाच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर मध्य जपानमधील हामाओका अणुप्रकल्प बंद करण्याचा आदेश नुकताच पंतप्रधान नाओटो कान यांनी दिला आहे. हा आदेश व घेतलेला निर्णय अत्यंत महत्वाचा, लक्षवेधी आहे. मानव निसर्गाच्या सामर्थ्यापुढे टिकू शकत नाही ही बाब आता तज्ज्ञांनाही मानावीच लागेल. तरी सुद्धा जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प उभारणी करण्याचा अंतिम निर्णय झाल्यास रिश्टर स्केल ९.० तीव्रतेपेक्षा जास्त तीव्रतेचा भूकंप झाल्यास, त्सुनामी आल्यास जीवित आणि वित्तहानी होऊ नये म्हणून किंवा याचे प्रमाण शक्य तितके कमी होण्याच्या उपाययोजना अगोदर करून त्याचे प्रयोग, प्रात्यक्षिक करणे अत्त्यावश्यक आहे. देशात सध्या बहुसंख्य वीज निर्मिती प्रकल्पांमध्ये कोळशाच्या सहाय्याने वीज निर्मिती करण्यात येत आहे. यासाठी लागणार्‍या कोळशाच्या किंमती वाढत आहेतच. वीज निर्मितीसाठी पुरविला जाणारा कोळसा, त्याची उपलब्धता, गुणवत्ता इ. बाबी फारशा गांभीर्याने घेतल्या जाताना दिसत नाहीत. परिणामी उपलब्ध होणार्‍या कोळशातून बराच कोळसा वाया जातो, फेकून द्यावा लागतो अशी वीज निर्मिती केंद्रांची ओरड असते. लोकसंख्या वाढीबरोबर वीजेची मागणी देखील वाढतच जाणार हे सत्य नाकारले जाऊ शकत नाही. गेल्या काही वर्षात वीज महाग झाली असून सततच्या भार-नियमनामुळे अनेक वीजग्राहक वीजेची बिलं भरेनासे झाले असून 'वीज द्या- बिल घ्या' असा अनेकांचा सूर आहे, याचबरोबर वाढत्या थकीत बाकीमुळे वीज कंपनीचा तोटा वाढतो आहे. हा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसल्याचे दिसते. अनेक शासकीय, निमशासकीय संस्थांकडे वीजेची मोठ्या प्रमाणात थकबाकी असून वीज चोरीकडे राजकीय दबावामुळे दुर्लक्ष करावे लागत असल्याची वीज कंपनीचीच तक्रार असते. मध्य प्रदेशात लवकरच वीज किमान ८ टक्क्यांनी महाग होणार असल्याचे वीज नियामक आयोगाने सुचित केले आहे. ठिकठिकाणच्या ट्रान्सफार्मरला लागणारे इंधन देखील महाग झाले आहे. उन्हाळ्यात वीजेची मागणी जास्त होत असून ग्रामीण भागात विशेषतः शेतीला जास्त पाण्याची आवश्यकता असते, परंतु किमान बारा तासांच्या भार-नियमनामुळे, अचानक उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे काही वेळा तर पीक हातचे जाण्याच्या, जळण्याच्या आणि शेतकरी बांधवांचा हाता-तोंडाशी आलेला घास पुन्हा पडत असल्याच्या घटना घडतात.

जागतिकीकरण अर्थातच ग्लोबलायझेशनमुळे वातावरणात अनुचित बदल झाले असून वातावरणात एकूणच उष्णता वाढली असल्याचे जाणवते. याचा फायदा करून घेण्याची वेळ येऊन ठेपली आहे. सूर्याच्या ऊर्जेच्या सहाय्याने वीज-निर्मिती करण्याचा मोठा प्रकल्प शासनातर्फे सुरू करण्यात यावा. सौर ऊर्जेचे महत्व नागरिकांना पटले असून त्याचा प्रभाव अगदी ग्रामीण भागातही पडलेला तेथील सौरऊर्जेच्या पथदिव्यांवरून दिसून येतो. शहरात सुद्धा उद्याने, सार्वजनिक ठिकाणांवर सौर ऊर्जेच्या सहाय्याने चालणारे पथदिवे बसविण्यात येऊन ते व्यवस्थित कार्य करीत असल्याचे दिसून येते. काही ठिकाणी सौर कंदिलांचा वापरही करण्यात येत असून अवघ्या पाच वर्षांपूर्वी धनाढ्यांच्या गच्चीवर दिसणारी 'सोलर सिस्टीम' आता मध्यम वर्गीयांच्याच नव्हे, तर ग्रामीण भागातही दिसू लागली आहे. Life Time Investment असे याला म्हटले जाते. 'सोलर पॅनल' द्वारे वाहन चालविण्यासह ऊर्जा तयार करून वीज निर्मिती ही संकल्पना आता देशात रूढ होत आहे. वाट्टेल तितकी वीज, चोवीस तास वीज निर्मिती होऊन विकास साधणारी ही योजना साकार झाल्यास सौर ऊर्जा लवकरच काळाची गरज ठरेल, तो दिवस दूर नाही 

Amol Wakudkar
Mob.9850722808
www.snusolar.co.in
Email:- shivnivrutti@gmail.com


सूर्यचुलीत कोणकोणते पदार्थ तयार करता येतात? 
                                              

> भाकरी आणि चपाती सोडून सूर्यचुलीत अगदी सगळे पदार्थ करता येतात. कारण भाकरी-चपातीसाठी सुमारे ३२५ ते ३५० अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते. मात्र, सध्याच्या स्थितीत सूर्यचुलीत मिळणारे तापमान हे १३० ते १३५ अंश सेल्सिअसपर्यंत असतं. त्यामुळे चपाती, भाकरी भाजणं अशक्य होतं. सूर्यचुलीत मिळणा-या कमीत कमी तापमानामुळे पदार्थ हळुवारपणं शिजतो. त्यामुळे तो चविष्ट बनतो. परिणामी पदार्थातील जीवनसत्त्वांची हानी होत नाही. डाळ, भात, अंडं हे पदार्थ त्यात उत्तमरीत्या शिजतात. पदार्थाचा मऊ किंवा कठीणपणा त्याचा विचार करता एक ते दीड तासात अन्न शिजतं. थंडीत मात्र पदार्थ शिजताना काहीसा अधिक वेळ लागू शकतो. दुपार आणि संध्याकाळच्या जेवणात काय केलं जाणार आहे, याची कल्पना गृहिणींना असते.
या सूर्यचुलीत सगळय़ा प्रकारची कडधान्यंही शिजतात, हे विशेष. विदर्भात मोठय़ा प्रमाणात सूर्यप्रकाश आहे, अशा ठिकाणी काबुली चणेही दोन तासात शिजतात. म्हणजे इतर अन्नही याच कालावधीत शिजू शकतं, हे निश्चित. सूर्यचूल ही हातातील ब्रीफकेससारखी (पेटीसारखी) असते. त्यामुळे शहरात ही सूर्यचूल गच्चीवर तर ग्रामीण भागात, अंगणात जिथे पुरेसा सूर्यप्रकाश असतो तिथे ठेवावी. सकाळी नऊ ते दुपारी दोन ही वेळ पदार्थ शिजवण्यासाठी उत्तम असते. दोन वाजल्यानंतर तापमान कमी होऊ लागतं. त्यामुळे वरील कालावधीत सूर्यचूल सोयीनुसार गच्ची अथवा अंगणात जिथे सूर्यप्रकाश असेल त्या ठिकाणी ठेवावी. अनुभवानं अन्न शिजण्याचा अंदाज निश्चित कळतो.
सूर्यचुलीमुळे घरातील ५० टक्के इंधनाची बचत होऊ शकते. डाळ, भात, भाज्या, कडधान्यं उत्तम शिजतात. तसंच रवा, बेसन, शेंगदाणेदेखील चांगल्या प्रकारे भाजता येतात.
शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ उत्तमरीत्या शिजतात. मांसाहारी पदार्थासाठी थोडा जास्त वेळ लागतो. सद्यपरिस्थितीत सर्वाधिक खर्च हा स्वयंपाकाच्या इंधनावर होत असतो. अशा वेळी ५० टक्के इंधनाची बचत होणं, म्हणजे पैसे वाचवणं त्याचबरोबरच राष्ट्रीय संपत्तीचा -हास आणि प्रदूषणाला आळा घालणं होय.
                                                         

असे आहे सौर वाळवणी यंत्र

                                                          
सूर्यकिरणे प्लॅस्टिक आच्छादनातून एकदा वाळवणी यंत्रात शिरल्यानंतर पुन्हा ती आतल्या आतच परावर्तित होत राहतात, त्यामुळे आतील तापमान हे बाह्य वातावरणातील तापमानापेक्षा साधारणतः 15 ते 20 अंश सेल्सिअसने वाढते. या वाढीव तापमानामुळे आत ठेवलेल्या पदार्थांची वाळण्याची प्रक्रिया वेगाने होते.
सौरऊर्जा हा स्वच्छ, मुबलक आणि विनामूल्य स्रोत असल्याने त्याचा वापर ही काळाची गरज ठरली आहे. पारंपरिक ऊर्जा साधने मर्यादित असल्यामुळे त्यांच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. अशावेळी सौरऊर्जा व इतर अपारंपरिक साधनांचा वापर करून ऊर्जा बचत करायला हवी. यामुळे ऊर्जा बचतीबरोबरच कुटुंबाच्या आर्थिक नियोजनासही मदत होईल. घरगुती वापरासाठी सौरऊर्जेवर चालणारी अनेक लहान मोठी यंत्रे बाजारात उपलब्ध आहेत. याचबरोबरीने सुटसुटीत, बहुपयोगी, स्वस्त आणि घरच्या घरी आपल्याला सौर वाळवणी यंत्र तयार करता येते.

सौरऊर्जेचा वापर करून प्लॅस्टिक आच्छादनाद्वारे बंदिस्त जागेत केलेली वाळवणी म्हणजे सौर वाळवणी. सूर्यकिरणे प्लॅस्टिक आच्छादनातून एकदा वाळवणी यंत्रात शिरल्यानंतर पुन्हा ती आतल्या आतच परावर्तित होत राहतात, त्यामुळे आतील तापमान हे बाह्य वातावरणातील तापमानापेक्षा साधारणतः 15 ते 20 अंश सेल्सिअसने वाढते. या वाढीव तापमानामुळे आत ठेवलेल्या पदार्थांची वाळण्याची प्रक्रिया वेगाने होते.

...असे आहे सौर वाळवणी यंत्र - 1) वाळवणी यंत्राच्या लोखंडी सांगाड्यावर 200 मायक्रॉन जाडीच्या अर्धपारदर्शक प्लॅस्टिक शीटचे आच्छादन असते.
2) प्लायवूडपासून बनवलेल्या तळभागाला काळा रंग दिलेला असल्याने सूर्यकिरणे जास्त प्रमाणात शोषली जातात.
3) तंबूसारखा आकार व जोडणीस सोपे रचना आहे.
4) क्‍लिपच्या साहाय्याने सहज व कमी वेळेत जोडणी व काढणी शक्‍य.
5) एका वेळी 10 किलो पदार्थांची वाळवणी शक्‍य.

...असा करा यंत्राचा वापर 1) वाळवणी यंत्राची उभारणी पूर्व-पश्‍चिम अशी करावी.
2) प्लॅस्टिक आच्छादन नेहमी स्वच्छ ठेवावे. त्यावर धूळ साचू देऊ नये. यामुळे सूर्यकिरणे अडवली जाणार नाहीत.
3) उभारणी करताना प्लॅस्टिक आच्छादन क्‍लिपांच्या साह्याने घट्ट बसवावे. आतील गरम हवा बाहेर जाणार नाही याची दक्षता घ्यावी.
4) उभारणी करतेवेळी प्लॅस्टिक आच्छादन फाटल्यास ते पारदर्शक चिकट पट्टीने चिकटवून घ्यावे.
5) या यंत्राची उभारणी मोकळ्या जागेत करावी. दिवसभरात त्यावर सावली पडणार नाही याची काळजी घ्यावी.
6) शक्‍य असल्यास याची उभारणी घराच्या छतावर करावी, जेणेकरून प्राण्यांचा उपद्रव होणार नाही.
7) हे यंत्र जेव्हा वापरत नसेल तेव्हा त्यावरील आच्छादन व्यवस्थित घडी करून उंदीर, घुशी कुरतडणार नाहीत अशा ठिकाणी ठेवावे.
8) कालांतराने प्लायवूड काळा रंग केल्यास त्याला पुन्हा रंग द्यावा.
9) सांगाडा गंजणार नाही याची काळजी घ्यावी.

सौर वाळवणी यंत्राचे फायदे - 1) उन्हातील खुल्या वाळवणीपेक्षा यामध्ये वाळवलेल्या पदार्थांचा दर्जा उत्तम असतो.
2) बाह्य वातावरणातील घटकांपासून संरक्षण मिळाल्याने सूक्ष्मजंतूंचा प्रादुर्भाव होत नाही.
3) प्लॅस्टिक आच्छादनामुळे हवेतील धूळ, पालापाचोळा इत्यादी आतील पदार्थामध्ये मिसळत नाहीत.
4) प्लॅस्टिक आच्छादनामुळे पाऊस व वाऱ्यापासून पदार्थांना संरक्षण मिळते.
5) प्लॅस्टिक आच्छादनामुळे पक्षी, कीटक व प्राणी यांच्यापासून पदार्थांना संरक्षण मिळते.
6) उन्हातील खुल्या वाळवणीपेक्षा यामध्ये लवकर वाळवणी होते, शिवाय रात्रीच्या वेळी पदार्थ गोळा करून झाकून ठेवावे लागत नाहीत.
7) याची उभारणी सोपी असून, उभारणीसाठी कुशल कामगाराची आवश्‍यकता नाही.
8) उन्हातील खुल्या वाळवणीपेक्षा या वाळवणी यंत्रामध्ये तेवढ्याच वस्तुमानाचे पदार्थ घेतल्यास कमी जागा लागते.
9) याच्या वापरण्याचा कमी खर्च आहे.

उपयुक्तता - 1) धान्य वाळवणीसाठी
2) मिरची, कांदा इत्यादी वाळवणीसाठी
3) पालेभाज्या वाळवणीसाठी
4) पापड, कुरड्या, शेवया इत्यादी वाळवणीसाठी
5) मासे वाळवणीसाठी
6) आवळा, सुपारी व इतर पदार्थ वाळवणीसाठी
----------
10 किलो क्षमतेच्या यंत्रासाठी आकारमान तक्ता

वरीलप्रमाणे 10 किलो क्षमतेच्या यंत्र उभारणीसाठी अंदाजे  रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. शेतीमालाची वाळवणी करून त्याचा दर्जा उंचावण्यास या यंत्रणा चांगला पर्याय उपलब्ध आहे. 
                                                                    

सौर ऊर्जा साधनांचा अधिकाधिक वापर

देशात आज सौरऊर्जा, पवनऊर्जा अशा अपारंपरिक ऊर्जा साधनांचा अधिकाधिक वापर करून परांपरागत साधनांवरील ताण कमी करण्याची गरज आहे. देशात उदंड सूर्यप्रकाश आहे आणि भरपूर वारे वाहत आहेत. त्यांचा उपयोग करून वीज निर्माण केली तर पेट्रोल, डिझेल, गॅस, कोळसा आदी परंपरागत ऊर्जा साधनांचा तेवढाच वापर कमी होणार आहे. त्यामुळे मोठया प्रमाणात आपले परकीय चलनसुद्धा वाचणार आहे. म्हणून लोकांनी सौरऊर्जा वापरावी, हे खरे पण जोपर्यंत समाजधुरीण अशा वापराचा आदर्श उभा करीत नाहीत, स्वत: वापरून उदाहरण घालून देत नाहीत तोपर्यंत सामान्य माणसाला ही ऊर्जा साधने वापरावीशी वाटणार नाहीत. म्हणून राज्यपालांच्या राजभवनावर सौरऊर्जेतूनच सारे व्यवहार व्हावेत, असा केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा साधन मंत्रालयाने निर्धार केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून विविध राज्यांच्या राजभवनांवर सौरऊर्जा प्रकल्प राबवला जात आहे. यापूर्वी आसाम, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश या तीन राज्यांच्या राजभवनांवर सौरऊर्जा प्रकल्प राबवले गेले आहेत. तिथले सर्व व्यवहार आता वीज मंडळाच्या विजेवर चालत नसून सौर ऊर्जेवर चालत आहेत. सौरऊर्जेवर संशोधन करणा-या लोकांनी या उर्जा साधनांवर दिवे लावण्याबरोबरच पंखे, वातानुकूलित यंत्रणा, फ्रीज, टीव्ही हीही साधने चालवण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे एखाद्या ग्राहकाने आपल्या घरातले सगळेच व्यवहार सौर ऊर्जेवर चालावेत, असा अट्टाहास केला तर त्याला ते शक्य होईल आणि पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या विजेची त्याला अजिबात गरज भासणार नाही, इतके संशोधन या क्षेत्रात झालेले आहे. शेतातल्या विहिरीवर चालणारे पंपसुद्धा सौरऊर्जेवर चालत आहेत. महाराष्ट्रातली काही गावे सौरऊर्जेमुळे पूर्णपणे भारनियमनमुक्त झाली आहेत. तरीसुद्धा अजून या ऊर्जा साधनांच्या बाबतीत म्हणावी तेवढी जागृती झालेली नाही. म्हणूनच राज्यपालांच्याच बंगल्यावर सौर ऊर्जेने दिवे उजळायला लागले की, समस्त जनतेलासुद्धा आपण सौर ऊर्जेची कास धरावी, असे वाटायला लागेल. आपण जेवढी सौरऊर्जा वापरू तेवढी कमीच आहे. तिला लागणारे साधन म्हणजे सूर्यप्रकाश उदंड उपलब्ध आहे. जोपर्यंत सूर्य चमकत आहे तोपर्यंत सौर ऊर्जेला तोटा नाही. मुख्य म्हणजे सौर ऊर्जेचा कच्चा माल निसर्गात फुकटात उपलब्ध आहे. वाराही निर्सगात मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहे. वारे वाहात आहेत तोपर्यंत पवनऊर्जेला काही तोटा नाही. म्हणूनच राजभवनावरील कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री फारुख अब्दुल्ला यांनी जनतेला सौर ऊर्जेची कास धरण्याचे आवाहन केले. सौर ऊर्जेच्या वापरामुळे कोळसा, गॅस इत्यादींच्या आयातीवर होणारा खर्च कमी होईल. पूर्वी पारंपरिक वीज आणि सौरऊर्जा यांच्या उत्पादनाच्या खर्चात मोठा फरक होता. त्यामुळे सौरऊर्जा महाग वाटत होती. पण आता औष्णिक वीज केंद्रातील वीज महाग झाली आहे आणि सौरऊर्जा साधनांच्या किमती कमी झाल्या आहेत. तेव्हा प्रत्येक भारतीय नागरिकाने आपल्या घरात शक्य तेवढी सौरऊर्जा निर्मिती करावी. अशा प्रकारे ती तयार करणे, हेच खरे देशकार्य ठरणार आहे. राज्यपालांनी त्यासाठीच स्वत:च्या बंगल्यावर ती वीज वापरून उदाहरण घालून दिलेले आहे.
                                         




अपारंपरिक ऊर्जास्रोत:-

कुठल्याही इंधनाच्या वापराचा परिणाम निसर्गाच्या सर्व घटकांवर होत असतो. पाणी, हवा, समुद्रनद्या, वेगवेगळे जीव, तापमान, आर्द्रता, ऋतुमान, पर्जन्यमान, जमिनीचा कस, फळाफुलांचा दर्जा आणि निसर्गातील विविध चक्रांची गतिमानता अशा अत्यंत व्यापक अवस्थेत होणाऱ्या दूरगामी परिणामांचा आज कुठे सखोल विचार होऊ लागला आहे. पर्यायी इंधनासाठी आपण आज कित्येक गोष्टींचा अत्यंत कल्पकतेने विचार करू लागलो आहोत. सूर्यप्रकाश, एककेंद्रित सूर्यप्रकाश, वारा, जलप्रपात, समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा, किरणोत्सर्ग आणि अणू-रेणू, कॉर्न-८५, सेल्युलोसिक-ई-८५, अनेक प्रकारच्या विजेर्या, विशिष्ट प्रकारचे शेवाळे, ब्यूटेनॉल, जैविक इंधनांचे प्रकार, उसापासून बनविलेले इथेनॉल, हायड्रोजनचे रेणू हे त्यापैकी काही आहेत. भविष्यात आपल्या पुढच्या पिढ्यांना लागणाऱ्या इंधनाची गरज यापैकी काही मोहरे भागविणार आहेत हे निश्‍चितच. अर्थातच प्रत्येकासाठी लागणारे तंत्रज्ञान वेगळे असणार आहे आणि ते विकसित करण्यासाठी मूलभूत विज्ञानावर मोठ्या प्रमाणात भर द्यावा लागणार आहे. मूलभूत विज्ञानातील प्रगती हाच खरे तर एखाद्या संस्कृतीच्या प्रगतीचा गाभा असतो, 

समुद्राच्या लाटा

सूर्यचंद्र या दोहोंच्या गुरुत्वाकर्षणामुळे समुद्राला भरती आणि ओहोटी येते. एखाद्या ठरावीक ठिकाणचे तापमान पाणी त्यामुळे एका दिशेत सुमारे सहा तास वाहते आणि त्याविरुद्ध दिशेत पुन्हा सहा तास वाहते. समुद्राला येणाऱ्या भरती ओहोटीचा वापर करून टर्बाईन फिरवता येते; पण त्यासाठी लाटेचा वेग कमीत कमी दोन मीटर प्रतिसेकंद असावा लागतो. पवनचक्कीतून योग्य दरात वीजनिर्मिती करायची असेल तर वाऱ्याचा वेग सात मीटर प्रतिसेकंद आवश्‍यक असतो. आज स्थानिक भरती-ओहोटी खूपच अचूक सांगता येऊ लागल्यामुळे भविष्यात या तंत्राचा योग्य वापर करून वीजनिर्मिती सहज शक्‍य आहे.हे आज थोडे विस्मृतीत गेलेले तत्त्व उद्या आपल्याला आठवावे लागणार आहे.
ऊर्जेच्या निर्मितीसाठी आज वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान विकसित होत आहे. त्यापैकी काही अत्यंत महत्त्वाच्या तंत्रांविषयी अगदी थोडक्‍यात विचार करू.

सोलर फोटोव्होल्टेइक्‍स (पीव्ही)

या विशिष्ट प्रकारच्या बॅटरीज निसर्गात मुबलक सापडणाऱ्या सिलिकॉन मूलद्रव्याच्या बनविल्या असतात. धन आणि ऋण प्रभारांच्या सिलिकॉनच्या पट्टीवर सूर्यप्रकाश पडला, ती त्या पट्टीमध्ये वीजनिर्मिती होते. ही वीज आपण इतरत्र वापरू शकतो. घरांच्या गच्चीवर, रस्त्यांच्या कडेला, बागांमध्ये किंवा ओसाड जमिनींवर अशा हजारो बॅटरीज लावून आपण सूर्यप्रकाशापासून वीज निर्माण करू शकतो. भारतासारख्या देशाला तर निसर्गाचे वरदान लाभलेले आहे. आपल्याला मिळणाऱ्या मुबलक सूर्यप्रकाशाचे अशाप्रकारे सोने करून घेण्याची संधी आपण दवडता कामा नये. आज या तंत्रज्ञानात काही त्रुटी आहेत. ढगाळ, पावसाळी हवेत किंवा रात्री या बॅटरीज वीज निर्माण करू शकत नाहीत, तसेच त्यांचे तापमान ४५ अंशांपलीकडे गेले तर फार कमी वीजनिर्मिती होते. परदेशात शेतांमध्ये बसविलेले पीव्ही आज ६० मेगावॉटपर्यंत वीज निर्माण करीत आहेत. भविष्यात त्यांची क्षमता १५० मेगावॉट करण्याची योजना आहे. आपण या क्षेत्रात खूपच मागे आहोत.

अतितीव्र सौर ऊर्जा

या तंत्रामध्ये भल्यामोठ्या अंतर्वक्र आरशांच्या साह्याने सूर्यप्रकाश एकत्रित केला जातो. त्यामुळे त्याची तीव्रता शतपटींनी वाढते. हा अत्यंत "गरम' प्रकाश विशिष्ट अशा मोठ्या भांड्यांवर केंद्रित करतात. या भांड्यात पाणी, तेल किंवा मिठाचे द्रावण भरलेले असते. बाहेरील तीव्र उष्णतेने आतील द्रव प्रचंड तापतो आणि ती उष्णता वाफेचे इंजिन चालविते. त्यातून वीजनिर्मिती होते. आतील द्रव रात्रीसुद्धा गरम रहात असल्याने चोवीस तास कमी-अधिक प्रमाणात वीज तयार होते.

पवनचक्की

पवनचक्की
आजच्या अनेक संशोधकांच्या मते, पवनऊर्जा भविष्यातील ऊर्जेची गरज भागवू शकेल. वातावरणाचा ऱ्हास थांबवू शकेल आणि अत्यंत किफायतशीर दरात सर्वसामान्यांना वापरता येऊ शकेल. आज गिअर्सविरहीत टर्बाइन्स वापरली जात आहेत. विजेची निर्मिती वाऱ्याच्या वेगातील बदलाच्या तिसरा घात इतकी होते. म्हणजे वाऱ्याचा वेग दुप्पट झाला तर वीजनिर्मिती आठपट वाढते. वाऱ्याचा वेग जास्त मिळविण्यासाठी पवनचक्की अधिकाधिक उंचीवर बांधतात. पवनचक्कीचा आकारही मोठ्यात मोठा ठेवतात. नेदरलँड्स देशात २० टक्के ऊर्जा पवनचक्‍क्‍यांमुळे तयार होते. पवनचक्कीमुळे तयार झालेली वीज दूरवर शहरात नेण्यात आज अडचणी येत आहेत. त्यावर विचार होण्याची गरज आहे.

भूऔष्णिक

आईसलँडमधील भूऔष्णिक वीज उत्पादन केंद्र
पृथ्वीच्या पोटात, खोलवर वाफेचे आणि गरम पाण्याचे प्रचंड साठे आहेत. भूऔष्णिक तंत्रज्ञान या वाफेला आणि तप्त पाण्याला पृष्ठभागावर आणून त्यापासून वीजनिर्मिती करते. बऱ्याचदा भूगर्भातील वाफेचे तापमान १८० ते ३७० अंश असते. अशा ठिकाणी केशनलिका (बोअरवेल्स) खणून ते पाणी वर आणतात. त्यापासून वीजनिर्मिती झाली की दुसऱ्या केशनलिकेतून ते पुन्हा भूगर्भात सोडून देतात. या वाफेबरोबर अनेक वायू पृष्ठभागावर येतात. त्यांना वेगळे करून इतर कामांसाठी वापर करून घेता येईल. आज त्यांना वातावरणात सोडून दिले जाते. भूऔष्णिक उर्जेचा वापर ज्या भागात अशी वाफ उपलब्ध आहे अश्याच ठिकाणी करता येते. सध्या आइसलँड या देशात भूऔष्णिक उर्जेवर मोठ्या प्रमाणावर उर्जानिर्मिती करतात.

कॉर्न आणि सेल्युलोसिक इथेनॉल

आजही खेडेगावात जैविक इंधन मोठ्या प्रमाणावर वापरतात. लाकूड, गाई-म्हशीचे शेण आणि गवत हे त्यांपैकी काही होत. इथेनॉल हे मकाऊसगहू अशा पदार्थांपासून कारखान्यात तयार करतात. आजच्या अनेक संशोधकांच्या मते इथेनॉलवर आधारित इंधन मानवाला, पशू-पक्ष्यांना आणि जमिनीच्या वापराला हानिकारक ठरते.

सौर ऊर्जा


सूर्यापासून उष्णता व प्रकाश या रूपाने येणाऱ्या ऊर्जेला सौर ऊर्जा असे म्हणतात. सौर ऊर्जेमुळे पृथ्वीवरील हवामानात बदल घडतात. सूर्यापासून पृथ्वीला १७४ पेटावॅट ऊर्जा मिळते. यातली सुमारे ३०% परावर्तित होते तर उरलेली वातावरणात शोषली जाते. या ऊर्जेमुळे वातावरण व जमीन तापते. वातावरण तापल्यामुळे समुद्र तापतो व पाण्याचे बाष्पीभवन होऊन वातावरणाचे चक्र सुरू राहते. सूर्यप्रकाश हे पृथ्वीवर प्रकाशमिळवण्यासाठीचा मुख्य स्रोत आहे.

सौर ऊर्जा तंत्रज्ञानाचे उपयोग

सौरचूल किंवा सौरकूकर
सौरचूल सूर्यप्रकाश परावर्तित करून एका ठिकाणी आणते व तयार झालेल्या वाफेने अन्न शिजवले जाते. सौरचुली भारतात वापरल्या जातात.
सौर बंब:-
                                                      
पाणी गरम करण्यासाठीच्या या उपकरणात टाकी तसेच सूर्याची उष्णता गोळा करणारा पॅनल यांचा समावेश असतो. हे उपकरण सामान्यतः छपरावरती किंवा मोकळ्या मैदानात पॅनलचे तोंड दिवस भरातील सूर्याची जास्तीतजास्त उष्णता मिळेल अशा बेताने बसविले जाते. पॅनलमध्ये काळ्या रंगाचा उच्च क्षमतेचा उष्णता शोषक थर असलेल्या पाणी खेळवणाऱ्या तांब्याच्या नळ्या असतात. पॅनलमधील या नळ्यांना टाकीतून सातत्यानं पाण्याचा पुरवठा केलेला असतो. सूर्यापासून येणारी किरणे पाणी खेळवणाऱ्या पॅनल वर पाडून थंड पाणी ८० अंश से.पर्यंत उष्ण करता येते. तापलेल पाणी नंतर उष्णताविरोधी केलेल्या टाकीत साठवलं जाते. टाकी उष्णताविरोधी असल्यामुळे टाकीत साठवलेलं पाणी रात्रभर गरम राहते. या उपकरणाला अतिशय कमी देखभाल लागते. सुरुवातीला एकदाच गुंतवणुकीची गरज असते. हे घरगुती स्वरूपातही बनवता येते. काळ्या रंगाचा पाईप सदैव उन्हात राहील असे पाहावे आणि त्यातून पाण्याचा प्रवाह अतिशय हळू स्वरूपात सोडला तरी पाण्याचे तापमान वाढते. हीच नळी जर एका काचेच्या पेटीत बंदिस्त केली तर वातावणातील हवेमुळे नळीचे थंड होण्याचे प्रमाण कमी होउन परिणामी उष्णता अजून वाढते.

सौर कंदील:-                               
सौर-कंदिलात फोटोव्होल्टाइक(पीव्ही) पॅनेलद्वारे विद्युतऊर्जा कंदिलातील विद्युतघटात(बॅटरी) साठवली जाते. सौर कंदीलातील दिव्यापासून सुमारे चार ते पाच तास प्रकाश मिळतो.भारतात विद्युतपुरवठा नसलेल्या अथवा कमी असलेल्या ग्रामीण भागात तर भारनियमन होत असलेल्या शहरांमध्येही प्रकाश मिळविण्यासाठी सौर कंदील वापरले जाते. काही सौर कंदीलात कमी उर्जेत अधिक काळ प्रकाश मिळविण्यासाठी वीद्युत दिव्यां ऐवजी एल ई डी वापरून कंदीलांची निर्मिती केली जाते

                                                            

                                                                                                                                   



सौर पथ दीप            
रस्त्यांवरच्या दिव्यांसाठी सौर ऊर्जेचा वापर करता येतो. सोलर पॅनल वापरून बॅटरी चार्ज करतात व त्यातून वीजपुरवठा केला जातो.

                                                              

शेती
विहिरीतून पाणी उपसण्यासाठी सौर उर्जेचा वापर करणे शक्य आहे. उजेडासाठीच्या सौर उर्जेचा वापरापेक्षा मात्र ते निश्चितच महाग आहे.

                                                             

Amol Wakudkar
M/S Shivnivrutti Universal Solar Systems
Mobile:- 9850722808